Monday, March 25, 2019

महान कोण ?भाग १

                            महान कोण ? भाग १ 

                                  
                                    एक साधीशी गोष्ट मला सांगायला आवडेल . तर गोष्ट अशी आहे कि एक रत्नप्रभा नावाची तरुण मुलगी होती. दिसण्यास अत्यंत सुंदर ,श्रीमंत आणि बुद्धिमान .तिने आपलं सर्व  शिक्षण पूर्ण  केलं. आणि  नंतर आपल्या गुरुजींना विचारलं,
            "मी गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला काय देऊ?"
त्यावर गुरुजी म्हणाले, "तुझ्या वडिलांनी मला सर्वकाही दिलं आहे. तू त्याची काही चिंता करू नको. " पण रत्नप्रभेने हट्टच धरला. आता गुरुजींना जरासा राग आला. आणि ते मनात म्हणाले "आता या मुलीची धैर्याची परीक्षा घ्यायलाच हवी. आणि तिला आता एक अवघड अट घालतो म्हणजे मग ती सारखी त्रास देणार नाही!"
                मग ते रत्नप्रभेला म्हणाले, "अमावास्येच्या रात्री तू दागदागिन्यांनी मढुन,सजून एकटी माझ्या घरी ये ."रत्नप्रभेच्या आणि गुरुजींच्या घराच्या मधात एक घनदाट अरण्य होत. रस्ता अत्यंत खराब होता. अरण्यात हिंस्त्र श्वापदं होती;वाटेत एक नदी पार करावी लागत असे. रत्नप्रभेने क्षणभर विचार केला आणि ती आपल्या घरी निघून गेली. गुरुजी मनोमन खुश झाले. त्यांना वाटलं, आपण बरं हिला गप्प केलं. 

                                   अखेर अमावास्येची रात्र आली. रत्नप्रभेने अंगावर दागदागिने चढवले. आणि ती गुरुगृही जाण्यासाठी सज्ज झाली. तिच्या वडिलांनी तिला पाहिलं आणि ते अतिशय अस्वस्थ झाले. "तू आता अशी यावेळी कुठे निघाली आहेस?" त्यावर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिच्या वडिलांना धक्काच बसला. 
                         ते म्हणाले ,"तुझे गुरुजी सज्जन, सतशील आहेत. कदाचित तूच त्यांना खूप त्रास दिला असशील, म्हणून धडा शिकवण्यासाठी त्यांनी तुला असं करायला सांगितलं असेल . माझी व त्यांची चांगली ओळख आहे. मी उद्या जाऊन त्यांना भेटेन व सारं काही स्पष्ट करून सांगेन. तू आता काही जाऊ नको. ते नक्की तुला क्षमा करतील. तू त्यांच्या मुलीसारखी आहे. 
         पण रत्नप्रभेला काही ते पटलं नाही. तिने जाण्याचा हट्ट धरला तोही गुरुजींना वचन दिल्याप्रमाणे एकटीनेच जाण्याचा! एवढ्या भयानक अरण्यातून ती एकटी चालू लागली. 
                      चालता चालता अचानक अरण्यात कोणीतरी तिला थांबवलं. तो एक तरुण चोर होता. त्याने आयुष्यात एवढे मौल्यवान दागदागिने कधीच पाहिलेले नव्हते. आज आपली चांगली कमाई होणार ,या विचाराने तो खुश झाला. त्याने तिला अडवलं... 
      पण ती क्षणभरही विचलित झाली नाही. ती म्हणाली , मी माझ्या गुरुजींना वचन दिलं आहे कि दागिन्यांनी मढुन तुमच्या घरी येईन. आणि मी दिलेला शब्द नेहमीच पाळते. पण मी माझ्या गुरूंना भेटून परत येतांना हे सर्व दागिने तुम्हाला देईन. 
         तिचं उत्तर ऐकून त्या चोराला फार नवल वाटलं. त्याने  तिला जाऊ दिल. पण तिचा गुपचूप पाठलाग करत तोही निघाला. शेवटी ती गुरुजींच्या घरी जाऊन पोहोचली. तिनं त्यांचा दरवाजा ठोठावला. गुरुजींना तिला पाहून आश्यर्याचा धक्का तर बसला पण खेदही वाटला. ते म्हणाले,"मला वाटलं तू माझं बोलणं विनोद समजून हसण्यावर नेशील. तुला नाउमेद करण्यासाठी मी आपलं तसा म्हणालो. या एवढ्या संकटांना तोंड देऊन तू इथे येशील, असं मला मुळीच वाटलं नव्हतं .तू घरी जा,पोरी. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तू आपला शब्द पाळणारी  स्त्री आहेस. "
                    रत्नप्रभा माघारी फिरली, तेवढ्यात तो चोर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. ती त्याला म्हणाली हे घ्या दागिने त्यावर तो चोर हसून म्हणाला , तुमच्यासारखी स्त्री सापडणे विरळाच. मला तुमच्याकडून काहीसुद्द्धा नको. तुमच्यासारखी माणसं काही नेहमी भेटत नसतात. "
                  रत्नप्रभा घरी पोहोचली . वडील दारात  वाट पाहत होते. तिला पाहून ते खूप आनंदी झाले व तिला म्हणाले ,"तू मोठ्या धीराची मुलगी आहेस. तू दिलेला शब्द पाळलास. आज तू खूप मोठा प्रवास करून आली आहेस. घरात ये आणि विश्रांती घे . 
                  या कथेतून बोध काय घ्यायचा? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. म्हणूनच या कथेचा बोध जाणून घेण्यासाठी लवकरच येणार  भाग २ ..... 
                  


                         
                                 






20 comments:

  1. Nice thought namee.... 2nd part lvkr banavshil ��������

    ReplyDelete
  2. “If the book is true, it will find an audience that is meant to read it.”
    👌👌👏👏👏🦁🌴🌴👩‍💼

    ReplyDelete
  3. 👏👏👏👏👏👏👏👏

    ReplyDelete
  4. 👏👏👏👏👏👏👏👏

    ReplyDelete

    " Be the Better version of yourself"             I was eagerly waiting for the " now " moment to come in my lif...